सोलापूर: देशात क्षयरोगाचे वाढते गांभीर्य लक्षात घेता, भारत सरकारचे ‘क्षयमुक्त भारत’ ध्येय पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. यावर्षी “होय आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो..! नेतृत्व- सोलापूर जिल्हा समर्थित जनभागीदारी!” या घोषवाक्यासह जिल्ह्यात जनजागृती आणि तपासणी मोहिमेला गती देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.
सिबिनॅट (जीन एक्सपर्ट) तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन
क्षयरोगाचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्ह्यात आधुनिक ‘सिबिनॅट’ यंत्रणा कार्यान्वित आहे. हे मशीन जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि बार्शी येथे उपलब्ध आहे. अति गंभीर स्वरूपाच्या संशयित रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात ५ वा क्रमांक पटकावला होता. “यावर्षी आपला जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यातील २९० अति जोखमीच्या गावांमध्ये १०० दिवसांचे विशेष अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये संशयितांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच, जिल्ह्यातील १०२७ ग्रामपंचायतींपैकी ४४६ ग्रामपंचायती क्षयमुक्त होण्यास पात्र ठरल्या असून, त्यात १७ सुवर्ण, ११४ रजत आणि ३१५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, जेणेकरून सोलापूर जिल्हा पूर्णपणे क्षयमुक्त करता येईल, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.











