सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ अंतर्गत मोहोळ–बसवनगर (तेरा मैल)–वळसंग या ८१.३७ किलोमीटर मार्गाच्या उन्नतीकरणासाठी तब्बल ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्रीय मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari यांनी दिलेल्या या मंजुरीबाबतचे पत्र सध्या व्हायरल झाले असून,
या प्रकल्पासाठी आमदार Subhash Deshmukh यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.उपलब्ध माहितीनुसार, आमदार देशमुख यांनी २०१४ पासून या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध वेळा निवेदन, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे त्यांनी हा विषय मांडला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळत केंद्र सरकारने ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूल व इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलापूर परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

विशेषतः औद्योगिक वाहतूक, कृषी उत्पादनांची ने-आण आणि व्यापारी व्यवहारांना यामुळे मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, या मंजुरीबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. “सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, भविष्यातही अशाच विकासकामांसाठी प्रयत्न सुरू ठेवणार,” असे त्यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून रस्त्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात आहे.











