सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने 91.31 टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद केली असून मुलींनी यंदाही मुलांपेक्षा सरस कामगिरी करत बाजी मारली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 35 हजार 240 मुले व 29 हजार 763 मुली यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 34 हजार 846 मुले व 29 हजार 469 मुली असे एकूण 64 हजार 315 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामधून 30 हजार 636 मुले व 28 हजार 091 मुली असे एकूण 58 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकालात मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 87.91 टक्के राहिले असून मुलींचे उत्तीर्ण प्रमाण तब्बल 95.32 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुलींनी पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.विशेष श्रेणीत 15 हजार 531 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 19 हजार 543 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 16 हजार 865 विद्यार्थी तर पास श्रेणीत 6 हजार 788 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 195 शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे.दरम्यान, इयत्ता अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी 36 हजार 300, वाणिज्य शाखेसाठी 15 हजार 020 तर कला शाखेसाठी 33 हजार 980 इतकी प्रवेश क्षमता उपलब्ध करण्यात आली आहे.

एकूण 819 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 85 हजार 300 जागा उपलब्ध असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी दिली. विद्यार्थ्यांनी जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.










