भाजपने तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार; माजी आमदार रविकांत पाटील यांची घोषणा
सोलापूर : इंडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेले माजी आमदार रविकांत पाटील यांनी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. भाजप पक्षाने तिकीट दिल्यास आपण इंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची स्पष्ट घोषणा त्यांनी केली. इंडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील भाजप नेत्यांनी मला पक्षाच्या कामात सक्रिय होण्याचे आवाहन केले असून पक्ष माझ्या उमेदवारीचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. “मी पूर्वीही भाजपमध्ये होतो आणि आजही भाजपमध्येच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यमान आमदार यशवंतगौडा पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणात महामार्ग उभारले गेले. मात्र तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर स्थानिक प्रशासनाचे अपयश स्पष्ट दिसते,” अशी टीका त्यांनी केली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावरही त्यांनी गंभीर आरोप करत ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा केला. “मतदारसंघातील कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या आग्रहामुळे मी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक असेल,” असेही त्यांनी सांगितले.


तब्येत सुधारली असून जनतेच्या सेवेसाठी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे सांगत, “मी आमदार असताना कधीही कोणत्याही अधिकाऱ्याला धमकावले नाही. आज निवृत्त अधिकारीही आमच्या पाठीशी उभे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडीतच कार्यालय सुरू करून संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क मोहिमेला वेग देणार असल्याचेही माजी आमदार रविकांत पाटील यांनी स्पष्ट केले.










