सोलापूर : उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आजूबाजूला एखादी अप्रिय घटना किंवा बेकायदेशीर बाब घडत असल्यास नागरिकांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, सहा विशेष पथकं नेमण्यात आले आहेत तसेच २४ तास नाकाबंदी असेल, अशी माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. शिवाय सदर बाझार आणि एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत आवश्यकता भासल्यास पोलिसांकडून पाणी टँकर पाठवू, असे त्यांनी सांगितले.


आगामी बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २२ मे रोजी आयुक्तालयात शांतता कमिटी बैठकीत पोलिस आयुक्त एम. राजकुमार अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सदस्य वसीम बुऱ्हाण, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सोलापूर महानगरपालिकेचे सारिका अंकुलवार, तपन डंके, आरटीओचे विजय पाटील, पशुसंवर्धन विभागाचे तांबडे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक अधिकारी समीर पाटील, मंडई निरीक्षक खाजप्पा कट्टीमनी आदीची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी प्रस्तावनेत ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करणार नाही किंवा त्यांची अवैध कुर्बानी देणार नाही, याची नोंद घ्यावी. उपायुक्त यावलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने आणि पंडित उपस्थित होते.















