सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील गैरव्यवस्थापनाचा फटका आता प्रवासी आणि वाहनधारकांना बसत आहे. स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगच्या जागेतील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य निचरा मार्ग तुंबल्याने संपूर्ण परिसरात सांडपाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नवीन पार्किंग परिसरातील निचरा मार्ग कचऱ्यामुळे बंद झाला आहे. परिणामी साचलेल्या पाण्यात प्लास्टिक व इतर कचऱ्याचा खच पडला आहे.
याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम दिसून येत असून, त्यामध्ये भटकी जनावरे आणि कुत्री खाद्यपदार्थ शोधताना दिसतात. रेल्वे प्रशासनाकडून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये प्लास्टिक, कागद व इतर कचरा अडकला आहे. पाण्याचा निचरा बंद झाल्याने दूषित पाणी थेट पार्किंगच्या रस्त्यावर साचले आहे. या साचलेल्या पाण्यात कचरा तरंगत असून, डासांची पैदास वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रवाशांमध्ये संताप सोलापूर रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. वाहन पार्क करण्यासाठी किंवा नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या साचलेल्या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. ‘पार्किंगसाठी पैसे मोजूनही अशी घाण सहन करावी लागत असेल, तर प्रशासन नेमके काय करत आहे?’ असा संतप्त सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला.


कारवाईची मागणी साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून चिखलामुळे पादचाऱ्यांचे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता व सौंदर्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासन व संबंधित कंत्राटदाराने तुंबलेला निचरा मार्ग तातडीने मोकळा करून पार्किंग परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.











