सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे, या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली ही तीव्र खंत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. “साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

शेखर गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, “साहेब मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले व माण-खटाव मधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकतीने निवडून आणण्याचे काम केले. याचे साक्षीदार माझ्या मान-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवले.”











