करमाळा, : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागाला रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. केतूर (क्र. १) परिसरात भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वादळी वाऱ्यामुळे शेतकरी वर्गालाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) आणि शालन जगन्नाथ नवले (वय ७५) हे दाम्पत्य उजनी जलाशयालगतच्या आपल्या वस्तीवर राहत होते. रविवारी रात्री सुमारे नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ते जेवणासाठी बसले असताना अचानक जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे घराशेजारील सिमेंट विटांची भिंत कोसळून दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळ आजूबाजूच्या वस्तीपासून दूर असल्याने रात्री उशिरापर्यंत कोणालाही या दुर्घटनेची माहिती मिळाली नाही. दरम्यान, करमाळ्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. सोमवारी सकाळी तो वस्तीवर पोहोचला असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे केतूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नवले दाम्पत्याच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका संपूर्ण उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, केतूर आणि वाशिंबे परिसरात जोरदार वाऱ्यामुळे शेकडो एकरांवरील केळीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी आंब्यांची झाडे फळांसह उन्मळून पडली असून फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचेही नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.











