सोलापूर, : प्रभाग क्रमांक २६ मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क दरम्यानचा रस्ता ड्रेनेजच्या कामानंतर अनेक महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत होता. ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करणे अपेक्षित असतानाही संबंधित ठेकेदाराने ते न केल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकांच्या तक्रारी आणि नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.


रस्ता उखडलेला असल्यामुळे पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली होती. धुळीचे प्रमाण वाढल्याने परिसरातील अनेक नागरिकांना श्वसनाच्या तक्रारीही निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. या समस्येबाबत नागरिकांनी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची भेट घेऊन समस्या मांडली. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. कार्यकाळ संपल्यानंतरही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सक्रिय असल्याचे सांगत स्थानिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.











