शिरापूर योजनेतून चार पंपांद्वारे २५ दिवसांचे रोटेशन; ६३३ हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ
कारंबा : उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. उजनी प्रकल्पाचे पाणी सीना नदीमार्गे शिरापूर-कोल्हापूर बंधाऱ्यात आणण्यात आले असून, मोहितेवाडी येथून चार पंपांच्या माध्यमातून कारंबा परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. हे रोटेशन २५ दिवसांचे असणार आहे. कारंबा येथे पाणी दाखल होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला. शेतकरी दत्तात्रय भुट्टे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, महेश पेंडपाले, संजय आदाटे, खंडू भुट्टे, बाणाजी आदाटे, काकासाहेब चव्हाण, हरिहर सुतार, दीपक सुतार, बबलू निचळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कारंबा गावातील सुमारे ६३३ हेक्टर क्षेत्राला भविष्यात या पाण्याचा लाभ मिळणार आहे. आउटलेटला पाइपलाइन जोडून शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पाणी घेऊन जाता येणार आहे. शिरापूर योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये नान्नज, बीबीदारफळ, अकोले, काटी, गुळवंची, मार्डी, नरोटेवाडी, कारंबा, भोगाव आणि बानेगाव या गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे. उजनीचे पाणी कारंब्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वर्षातून चार वेळा रोटेशन पद्धतीने पाणी मिळाल्यास पिकांची लागवड वाढून उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लागेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली