सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी या बदल्यांबाबत जिल्हा उपनिबंधकांना पत्र देत प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी यापूर्वी सहकारी संस्थांच्या सचिवांच्या बदल्यांबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी केली होती. मात्र, या मागणीवर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव सोसायटीचे संपत बिराजदार, तीळगाव आणि होटगी सोसायटीचे पीरसाब अमलीचुंगे तसेच बाळगी आणि औज एम. सोसायटीचे राजकुमार सगरे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित सचिवांना अद्याप बदलीचे आदेश प्रत्यक्ष मिळालेले नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बदल्यांवरून वाद सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सचिवांच्या बदल्या झाल्याने या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यामुळे या बदल्यांना तातडीने स्थगिती देऊन पूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.