सोलापूर:जिल्हयातील सहकार आणि खाजगी साखर कारखानदारीमध्ये मोठे नाव असलेल्या लोकमंगल समूहाच्या भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऊस गाळप होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, अद्याप शेतकऱ्यांच्या घामाचे दाम त्यांच्या पदरात पडलेले नाहीत. ‘जानेवारी महिन्यात बिले जमा करू’ असे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाने आता मार्च महिना उजाडला तरी टाळाटाळ सुरू केल्याने बळीराजा संतापला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारकवठे येथील लोकमंगल युनिटला ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी दिला होता, त्यांना नियमानुसार १४ दिवसांच्या आत बिले मिळणे अपेक्षित होते. मात्र, कारखान्याने आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत वेळकाढूपणा केला. शेतकऱ्यांनी जेव्हा जानेवारी महिन्यात विचारणा केली, तेव्हा कारखाना प्रशासनाने लेखी आणि तोंडी स्वरूपात खात्री दिली होती की, “जानेवारी अखेरपर्यंत सर्व थकीत बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.” मात्र, फेब्रुवारी उलटून आता मार्च महिना अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांचे खाते अद्याप ‘कोरेच’ आहे.
हवालदिल झालेले शेतकरी जेव्हा कारखान्याच्या ऊस बिल विभागात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी जात आहेत, तेव्हा त्यांना सन्मानजनक वागणूक मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. “वरच्या स्तरावरून अद्याप फंड आला नाही” किंवा “लवकरच व्यवस्था होईल” अशी ठराविक उत्तरे देऊन शेतकऱ्यांना माघारी धाडले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, कारखान्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आज शेतकरी हा चौफेर संकटात सापडला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, बँकेचे हप्ते आणि पुढील हंगामासाठी लागणारी खते-बियाणे यासाठी शेतकरी ऊस बिलावर अवलंबून असतो. लोकमंगल कारखान्याने बिले थकवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बँकांचे हप्ते थकले असून त्यांना व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
लोकमंगल कारखान्याच्या या मनमानी कारभाराविरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. जर येत्या काही दिवसांत थकीत बिले मिळाली नाहीत, तर कारखान्यावर धडक मोर्चा काढण्याचा आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यातच जर शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होत असेल, तर दाद मागायची कोणाकडे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.










