हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी लावली हजेरी
सोलापूर : प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने, उत्तर सोलापूर येथील मौजे सोरेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’अंतर्गत ‘समाधान शिबिराचे’ अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सोरेगाव येथील शिबिरामध्ये जमिनीच्या नोंदी, प्रलंबित फेरफार, सातबारा उतारा दुरुस्ती, तसेच उत्पन्न व इतर दाखल्यांशी संबंधित अर्जांची थेट स्वीकृती करण्यात आली. अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली कामे या एकाच व्यासपीठावर पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत.



या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्यान उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील,हद्दवाढ भागातील नगरसेवक , राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, मधुसूदन जंगम, दीपक जमादार , व्हीव्हीपी कॉलेज चे संस्थापक नाना चव्हाण, महसूल अधिकारी देशमुख या मान्यवरांसह परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुभाष देशमुख यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले असून, “प्रशासन जनतेच्या दारी” नेण्याच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी या शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हे शिबिर केवळ अर्ज गोळा करण्यासाठी नसून, नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक ‘सिंगल विंडो’ सिस्टिम म्हणून प्रभावी ठरले आहे. यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे.










