सोलापूर/पंढरपूर, : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज वारकरी धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर त्यांनी वारकरी बांधवांसमवेत सहभोजनाचा लाभ घेत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली ही धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा, सुरक्षित आणि सुसज्ज निवारा ठरेल. ही वास्तू केवळ मुक्कामाची सुविधा नसून भक्ती, सेवा, संस्कार आणि वारकरी परंपरेचे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडीबा मोरडे (अण्णा गुरुजी) यांच्या कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी वारकरी सेवेचे रोवलेले बीज आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून, त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी हक्काचे घर निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या धर्मशाळेच्या उभारणीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, वारकरी सेवा मंडळ, देणगीदार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. या वास्तूची स्वच्छता, पावित्र्य आणि देखभाल राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी पंढरपूरच्या विकासासाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेल्या दूरदृष्टीचाही त्यांनी उल्लेख केला. वारकऱ्यांना दर्जेदार, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालखी मार्ग, पायाभूत सुविधा आणि वारकरी-केंद्रित विकासकामांवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने सुमारे ₹४,००० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या आराखड्यात मंदिर परिसराचा विकास, प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण, चंद्रभागा घाटाचे आधुनिकीकरण, पालखी तळांची उभारणी, रस्त्यांचे सक्षमीकरण तसेच इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. या विकासकामांमुळे वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व आवश्यक नियोजन केले असून, प्रत्येक वारकऱ्याची वारी सुखकर, सुरक्षित आणि मंगलमय व्हावी, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचेही त्यांनी सांगितले.