सोलापूर | सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम सोमवारी शहरातील विविध मनपा शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २८ येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने उपस्थित होते. तुळजापूर वेस येथील महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक २ येथे स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी उपस्थिती लावली. तसेच मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ येथे सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका अश्विनी चव्हाण व वनिता पाटील यांनी प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. यावेळी नरेंद्र काळे यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील विविध मनपा शाळांमध्ये नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त पवीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित आणि मनीषा मगर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. प्रवेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, संतोष बुलबुले, रजनी राऊळ, निलोफर शेख तसेच केंद्रीय मुख्याध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या प्रवेशोत्सवात नवागत विद्यार्थ्यांचे विविध शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर काही शाळांमध्ये खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी पालकांना मनपा शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि विविध शैक्षणिक सुविधांची माहिती देण्यात आली. डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, “शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालकाने नियमित शिक्षण घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकांनी मनपा शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे.”











