सोलापूर, – वकिली व्यवसाय हा केवळ अर्थार्जनाचा व्यवसाय नसून, सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्ती जपणारे माध्यम आहे. समाजाप्रती असलेली ही बांधिलकी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मास लॉ असोसिएट्स करीत आहे, असे गौरवोद्गार जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काढले. मास लॉ असोसिएट्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शनिवारी एमआयडीसी येथील टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन सभागृहात विधिमित्र सेवा पुरस्काराचे वितरण अॅड. राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम हे होते.
यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रा. डॉ. विजया महाजन, अॅड. शर्मिला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विधी तसेच विविध विषयांवरील पुस्तकांच्या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘संचार’चे उपसंपादक हरिश्चंद्र कदम व पत्रकार आफताब शेख (विधिमित्र प्रसारमाध्यम सेवा पुरस्कार), देवीदास घोडके (विधिमित्र श्रमप्रतिष्ठा पुरस्कार), संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट (विधिमित्र सामाजिक सेवा पुरस्कार), अॅड. आझमोद्दीन शेख व अॅड. गीताराणी घनाते (विधिमित्र विधी सेवा पुरस्कार), श्रीनिवास चेरमन (विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार) आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्यांचा विधिमित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नुकतीच न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नागेश कोंडा आणि सोलापूर विद्यापीठात कायद्याच्या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळविलेले अॅड. अमर जिंदम यांचाही गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड. मोहन कुरापाटी यांनी तर स्वागत अॅड. श्याम आडम यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. स्नेहा नारा यांनी केले. आभार अॅड. अनिल वासम यांनी मानले.यावेळी अॅड. धनंजय वांझरे, अॅड. चैतन्य केंगार, अॅड. श्रीपाद अंकलगी, अॅड. श्रीधर काटकर, अॅड. स्नेहा पवार, अॅड. गायत्री गदार, अॅड. विनोद कुचन, नीलेश जिंबल आणि बालाजी कोंडा उपस्थित होते