सोलापूर : मुंबई ते बंगळुरू प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच अत्याधुनिक आणि वेगवान स्लीपर सुविधेसह ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करण्याच्या तयारीत असून, या नव्या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे.
प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने ही ट्रेन दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणार आहे. यामुळे पुणे, सोलापूर आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली असून मुंबई-बंगळुरू या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे.पुणे ते बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे सोलापूरहून पुणे आणि मुंबईकडे ये-जा करणारे प्रवासीही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या या मार्गावर प्रवासासाठी १८ ते २० तासांचा कालावधी लागतो.

मात्र, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे हा प्रवास अवघ्या १२ ते १३ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे तब्बल ६ ते ७ तास वाचणार आहेत.ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन पुणे, सोलापूर आणि वाडी मार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. काही पर्यायी मार्गांमध्ये कलबुर्गी किंवा हुबळी मार्गाचाही विचार सुरू आहे. गाडीचा वेग सुमारे १३० किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर सध्या धावणाऱ्या उद्यान एक्सप्रेससारख्या गाड्या बंद होणार नाहीत. दोन्ही सेवा एकत्र सुरू राहणार असल्याने प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.










