सोलापूर: राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून काढले आहे. सोलापूरचे कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असून, वाढत्या उष्म्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

शहरात सकाळपासूनच सूर्याच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. त्यातच किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. जमिनीतून निघणाऱ्या उष्ण वाफांमुळे घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शीतपेये, रसवंती गृहे आणि कलिंगड विक्रीच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे. मात्र, इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे










