निरोप समारंभात माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भावुक; प्रशासनाच्या सहकार्यामुळे विकासकामे मार्गी लागल्याची भावना
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निरोप समारंभात सोलापूरशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त करताना, “माझी बदली नागपूरला झाली असली तरी सोलापूर कायम माझ्या मनात राहील,” असे सांगितले. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेता आली, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी पदावरील यशस्वी कारकीर्द ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कामगिरीवर अवलंबून असते. प्रशासनात शिस्त आणि कठोरता आवश्यक असून त्यामुळे कामांना गती मिळते व जनतेला त्याचा थेट लाभ होतो. त्यांनी आपल्या कार्यकाळातील पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर विमानसेवा, आषाढी वारीचे यशस्वी नियोजन, पूरपरिस्थितीतील प्रशासनाचे कार्य तसेच जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा विशेष उल्लेख केला. “सामान्य नागरिकांसाठी काहीतरी चांगले करता आले, याचे समाधान आहे,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांनी उभारलेली प्रशासनाची कार्यक्षम चौकट पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

“सोलापूरने दिलेले प्रेम आणि सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही. बदली झाली असली तरी सोलापूरच्या कोणत्याही कामासाठी मी सदैव तत्पर असेन.”
— कुमार आशीर्वाद, माजी जिल्हाधिकारी












