निष्काळजी वाहनचालक ठरला मुलगाच; फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल
सोलापूर ; भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या भीषण अपघातात आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयटी कॉलेजसमोर घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या २० वर्षीय मुलावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून रोजी सकाळी उमाकांत कलप्पा कोरे (रा. बीबी दारफळ, ता. दक्षिण सोलापूर) यांचा मुलगा सुयश कोरे (वय २०) हा दुचाकी (एमएच १३ ईडब्ल्यू ३५१५) वरून आई पार्वती कोरे यांना घेऊन सोलापूरकडे येत होता. एमआयटी कॉलेजसमोर भरधाव वेगात असताना दुचाकी रस्त्यावरील दगडावरून गेल्याने पार्वती कोरे या दुचाकीवरून खाली फेकल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तोंड व कानातून रक्तस्त्राव होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती उमाकांत कलप्पा कोरे यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सुयश कोरे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गायकवाड करीत आहेत.

एका क्षणाच्या निष्काळजीपणाने आईचा जीव गेला
भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालना यामुळे घडलेल्या या अपघातात मुलासमोरच आईचा मृत्यू झाल्याने कोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना वाहनचालकांसाठी वेगावर नियंत्रण ठेवण्याचा आणि सुरक्षित वाहनचालनेचा गंभीर इशारा मानली जात आहे.











