सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत रविवारी सलग 18 तासांचा अखंड वाचन-अभ्यास उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ज्ञानार्जनाचे व्रत जोपासले. पर्यावरणाचा संदेश देत विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट यांनी या उपक्रमाचे नेटके नियोजन केले असून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासोबतच चिंतनशील दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
कुलगुरू प्रा.डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा समता सप्ताह साजरा होत आहे. या माध्यमातून व्याख्याने, चर्चासत्रे आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केला जात आहे. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













