पंढरपूर, : यंदाची आषाढी वारी यशस्वी, सुरक्षित आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून एक टीम म्हणून काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले. वारकरी आणि भाविकांना मागील वर्षापेक्षा अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी २०२६ च्या नियोजन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी पालखी मार्गावरील मुक्काम व विसावा स्थळांवर स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पालखी पुढे गेल्यानंतर चार ते पाच तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा, तसेच वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये, प्रकाशव्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वारी काळात आरोग्य विभागाने वारकरी व भाविकांना शंभर टक्के व्हिटॅमिन ‘ए’ व ‘डी’ गोळ्यांचे वितरण करावे, असे सांगत त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वारी कालावधीत रजा न घेण्याचे आदेश दिले. कोणत्याही अधिकाऱ्याने मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पालखीतळ आणि मुख्य रस्ते यांना जोडणारे संपर्क मार्ग तातडीने तयार करण्याच्या सूचना देतानाच उजनी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, चंद्रभागा नदी परिसरातील सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त यावरही विशेष भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही आणि मल्टी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारकऱ्यांची संख्या मोजणे (हेड काउंटिंग) आणि सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वारीपूर्वी विशेष तपासणी मोहीम राबवून अन्नधान्य व प्रसादाचे नमुने तपासले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनीही वारीसंदर्भातील नियोजनाचा आढावा सादर केला. प्रशासनाच्या व्यापक तयारीमुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुस्थितीत आणि सुविधायुक्त होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










