महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा; किमान ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
सोलापूर, : सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा चार तासांवर आणल्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सोलापूर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देऊन शेतीपंपांसाठी पूर्ववत किमान आठ तासांचा नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चानंतर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पेरणीच्या तोंडावर वीजपुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पिकांसह पशुधनालाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा ही दोन्ही महत्त्वाची खाती असूनही राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करत, सरकारला जनतेच्या प्रश्नांपेक्षा निवडणुकांचीच अधिक काळजी असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.











