१३० कोटींच्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आक्रमक; सत्ताधारी आमदारांच्या भूमिकेवर नाराजी
सोलापूर, :दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे सुमारे १३० कोटी रुपयांचे ऊसबिल थकीत असल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या कष्टाच्या आणि हक्काच्या पैशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन १२ व्या दिवशीही तीव्रतेने सुरू असून शेतकऱ्यांनी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत ऊसबिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ५५ ते ६० गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून, संपूर्ण थकीत रक्कम थेट बँक खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. ४) शेकडो शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयावर अर्धनग्न मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे ऊसबिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोकुळ साखर कारखाना दक्षिण सोलापूर तालुक्यात असतानाही दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह सत्ताधारी पक्षातील इतर लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. आंदोलनस्थळी अद्याप कोणत्याही सत्ताधारी आमदाराने भेट दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असली तरी हक्काचे पैसे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील माजी जिल्हा परिषद गटनेते आनंद तानवडे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे तसेच चेन्नई महामार्ग कृषी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसमवेत नाश्ता व भोजन करतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, थकीत ऊसबिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.










