पंढरपूर, : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होत असून, यंदाच्या आषाढी यात्रेसाठी पालखी मार्ग, पालखीतळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा तब्बल दीडपट अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी केलेल्या मागण्या आणि सूचनांची अंमलबजावणी सुरू असून सुमारे ८० टक्के कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात केबीपी महाविद्यालय, पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि सोहळा प्रमुख यांच्यासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, आषाढी वारीच्या अनुषंगाने भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही निविदा प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याने सर्व कामांना गती देण्यात आली असून पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.

पालखी तळांवर मुरमीकरण, वाढीव जागांची उपलब्धता, सुलभ शौचालये, स्नानगृहे, वॉटरप्रूफ मंडप आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावरील पेट्रोल पंपांवर वाहनांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जाणार असून एलपीजी गॅसचा पुरवठाही अखंड ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार विशेष नियोजन करण्यात आले असून वारी कालावधीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी मार्ग व तळांवर जर्मन हँगर सुविधेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोड्या व घोड्यांसाठी स्वतंत्र निवारा आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी पुढे गेल्यानंतर संबंधित मुक्कामस्थळी तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गोपाळकाला झाल्यानंतर पूर्णिमेला होणाऱ्या संत देव भेट सोहळ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन सोहळे पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत पालखी सोहळा प्रमुखांनी वाढत्या दिंडी संख्येमुळे काही ठिकाणी पालखी तळ अपुरे पडत असल्याची बाब मांडली. तसेच पोलीस बंदोबस्त वाढविणे, टँकरची संख्या वाढविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि पालखीतळांचे मुरमीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाकडे मांडल्या. दरम्यान, गतवर्षी पालखी मार्ग, पालखीतळ आणि रिंगण स्थळांवर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त करत यंदाही त्याच दर्जाच्या आणि अधिक व्यापक सुविधांची अपेक्षा व्यक्त केली.










