सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवस्वराज्य दिन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देत शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद, महानगरपालिका व विविध समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र दादा काळे, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे तसेच पंचायत समिती सभापती तेजस्वनी बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राज्यव्यवस्थेचे नव्हे तर लोककल्याण, न्याय, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रसेवेचा वारसा जपत समाजहित, ग्रामीण विकास आणि लोककल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषद परिसरात देशभक्ती आणि शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.










