सोलापूर, : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोठे अंतर्गत फेरबदल केले आहेत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या ११ पोलीस निरीक्षक (पीआय) आणि २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (एपीआय) बदल्यांचे आदेश २९ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले. या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे अन्वेषण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बदल्यांनुसार नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार यांची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे यांना सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दीपक ज्योतिराम पाटील यांची मोहोळ पोलीस ठाण्यात, तर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे यांची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अमूल शंकर कादबने यांची वैराग पोलीस ठाण्यात, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ भानुदास वाघमोडे यांची माळशिरस पोलीस ठाण्यात, तर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यूब मुजावर यांची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेश गणपतराव चिल्लावार यांची पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात, माळशिरसचे पोलीस निरीक्षक विकास चन्नवीर दिंड्डेरे यांची सायबर पोलीस ठाण्यात, तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दीपक लक्ष्मण बरडे यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस निरीक्षक कमलाकर नरसिंह गड्डीमे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अक्षय आप्पासो सोनवणे यांची प्रभारी अधिकारी म्हणून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अण्णासाहेब कड यांची सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे ग्रामीण पोलीस दलातील विविध शाखांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नव्याने मांडणी झाली असून, पोलीस प्रशासन अधिक परिणामकारकपणे कार्यरत राहण्यासाठी या फेरबदलांना महत्त्वाचे मानले जात आहे.












