माढा/अरण : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत रविवारी (दि. ३१ मे) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरण गावाजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला ट्रक (क्र. MH 14 KQ 1006) अरण गावाच्या हद्दीत असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळ पोहोचला असता समोरून येणाऱ्या दुचाकी (क्र. MH 45 J 1387) ला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी अक्षरशः चेंदामेंदा झाली आणि चालक काही अंतरावर फेकला गेला.या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार गणेश सावंत (रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) असे असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अरण गावात शोककळा पसरली आहे. तुषार हे कुटुंबातील कर्ते व सर्वांच्या परिचयातील असल्याने त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरात काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी PSI उमेश पवार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा प्रक्रिया सुरू केली. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.दरम्यान, मृत तुषार सावंत यांना वरवडे टोल नाका रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी तत्काळ मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी जगताप व सरडे यांना गस्तीपथक प्रमुख विजय साळुंके यांनी दिली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटून अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. विशेषतः अरण परिसरातील महामार्गावर वेगमर्यादेचे काटेकोर पालन आणि अधिक देखरेखीची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.











