सोलापूर : मोरवंची येथील प्रार्थना बालग्राममध्ये आयोजित “कृतिशील तरुणाई शिबिर 4.0” च्या उद्घाटन सोहळ्यात सामाजिक जाणीव, नेतृत्व आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय निवासी शिबिराचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.यावेळी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना, “स्त्री-पुरुष असा भेद न करता प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहिले, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते,” असे प्रतिपादन केले.
त्यांच्या विचारांना उपस्थित युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला युवा उद्योजक सुहास आदमाने, अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रतिनिधी अभय खोबरे, माविमचे जिल्हाप्रमुख सोमनाथ लामगुंडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सूर्यभान धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी प्रार्थना फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या बालकाश्रम आणि वृद्धाश्रम उपक्रमांचे कौतुक केले. निराधार बालके व वृद्धांसाठी सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान, गटचर्चा, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी युवकांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून युवक-युवती या शिबिरात सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रार्थना फाउंडेशन, सेवादायी फाउंडेशन आणि सर्व सेवाधार्यांनी विशेष परिश्रम घेतले.