No Result
View All Result
वारीसाठी भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी ६ वाजता १,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून हा विसर्ग करण्यात येणार असून, परिस्थितीनुसार पुढील टप्प्यांत विसर्गाचे प्रमाण नियंत्रित केले जाणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिली.
पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच जनावरे नदीच्या मुख्य प्रवाहापासून सुरक्षित अंतरावर ठेवावीत, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्गाच्या कालावधीत नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No Result
View All Result