सोलापूर ; अलनिनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापही पाऊस पडला नाही. जिल्ह्यातील पाणी जपून वापरले पाहिजे. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विजेची अडचण माहिती असल्याचे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना आजपासून २ ऐवजी ५ तास वीज मिळणार असल्याचे सांगितले. डीपी जळाल्यास तीन दिवसांत दुसरा डीपी देण्याचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजित पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आठ तास वीज देण्याची आग्रही मागणी केली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील म्हणाले, उजनी काठावर इंदापूर तालुक्यात आठ तास तर करमाळा तालुक्यात फक्त दोन तास वीज दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, आम्हालाही आठ तास वीज द्या, तशीच व्यथा आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली. कर्नाटकात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळते, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र दोन तासच वीज मिळते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
उजनीत कृष्णेचे पाणी अन् गाळ उजनीतील गाळ व वाळूचा उपसा व्हावा, कृष्णेचे पाणी उजनी धरणात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे केली. वाळू उपशासाठी न्यायालयातील विषय मार्गी लागले, इतर विभागाची मंजुरीही मिळाली आहे, लवकरच ही प्रक्रिया होईल. कृष्णेचे पाणी उजनीद्वारे मराठवाड्याला देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारला जात आहे, लवकरच मुख्य कामाची निविदाही काढली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
नीरा, टेंभू, भाटघरच्या पाण्याची मागणी माळशिरस, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांना टेंभू, निरा भाटघर व वीर धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तम जानकर व आमदार अभिजित पाटील यांनी केली. दोन दिवसांत उडतो डीपी शेतकऱ्यांना मिळालेला डीपी २ दिवसांत उडतो, त्यानंतर १५-१५ दिवस डीपी मिळत नसल्याचा मुद्दा मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपस्थित केला. डीपी खराब आहेत की, डीपीसाठी वापरले जाणारे ऑईल खराब आहे?, हे माहिती नाही परंतु ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले