सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांनी सोलापूर दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करत आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी संवाद साधताना देशमुख यांनी, “माझी ताकद खूप मोठी आहे. कोणाला किती मते पडतात, हे निकालाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र पाहील,” असे आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य केले.सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संपर्क साधला. या भेटींमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अनेक मतदारांनी विकासाभिमुख आणि अनुभवी नेतृत्वाला पसंती देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचा दावा देशमुख यांनी केला.देशमुख यांनी निवडणुकीकडे केवळ राजकीय लढत म्हणून न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देण्याची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, स्थानिक संस्थांचे अधिकार आणि निधी यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. विविध पक्षांतील सदस्यांकडून मिळणारा पाठिंबा आणि मतदारांमधील सकारात्मक वातावरण पाहता निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागेल, असा विश्वास देशमुख समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव देशमुख यांच्या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असून, आता सर्वांचे लक्ष मतदान आणि निकालाकडे लागले आहे.