सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून भाजपने आपल्या नगरसेवकांशी थेट संवाद साधत मतदानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी पक्ष संघटना सक्रिय झाली असून नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधत पक्षनिष्ठा जपण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वैराग परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते निरंजन भूमकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली असून विविध पक्षांकडून नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी विशेष नियोजन केले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेच्या या लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.