सोलापूर ; ब्रह्मपुरीची रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये (वय २५) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन तब्बल दीड महिना उलटूनही मंगळवेढा पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने रोहिणीचे वडील बाळासाहेब गिरजाप्पा शिवशरण यांनी मंगळवेढा पोलिसांच्या निषेधार्थ अज्ञातस्थळी कुटुंबीय आत्मदहन करण्याचा इशारा देऊन याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्यावर राहील, असा इशारा लेखी निवेदनाव्दारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.
रील स्टार रोहिणी हिने पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २६ मे २०२६ रोजी हॉटेल ग्रामपंचायतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तब्बल २३ दिवसांनी पोलिसांनी १८ जून २०२६ रोजी गुन्हा पोलिसांची दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन तब्बल पावणेदोन महिने होत आले तरीही मंगळवेढा आरोपीला अटक करण्याची मानसिकता दिसून येत नसल्याने पोलिसांचा मनमानी कारभार उघड झाला आहे.
यामुळे सर्वसामान्य जनतेमधून पोलिसांच्या कर्तव्यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीला अटक करू नये, यासाठी पोलीस दलातील एका नातलगाचा व राजकीय व्यक्तीचा दबाव असल्याबाबतचा संशय शिवशरण कुटुंबीयाने व्यक्त केला आहे. शिवशरण यांनी मंगळवेढा पोलीस आरोपीस अटक करणार नसतील, तर गृहमंत्र्यांनी राज्य गुप्तचर विभागाकडे हा तपास देऊन रोहिणी हिला न्याय मिळवून द्यावा, अशाही नागरिकांमधून व शिवशरण कुटुंबाकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, आरोपीस अटक न केल्यास शिवशरण कुटुंबीय अज्ञातस्थळी मंगळवेढा पोलिसांच्या निषेधार्थ व अन्यायाविरुध्द आत्मदहन करणार असल्याचे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करून या निवेदनाच्या प्रती राज्याचे पोलीस महासंचालक, राज्य महिला आयोग, राज्य गुप्तचर विभाग, पुणे पोलीस प्राधिकरण विभाग, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर आदींना ई-मेलव्दारे पाठविण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना बोलताना बाळासाहेब शिवशरण यांनी सांगितले.