सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह (पार्क चौक) आणि सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह (शेळगी) या वसतिगृहांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी या वसतिगृहाचा मोठा आधार ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असून सोलापूर शहरातील शासनमान्य शाळा अथवा महाविद्यालयात नियमित प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून तो आवश्यक कागदपत्रांसह भरून जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर येथे जमा करावा.
प्रवेश प्रक्रियेनुसार ४ जुलै ते १३ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी १४ व १५ जुलै रोजी करण्यात येईल, तर पात्र विद्यार्थ्यांची यादी १५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर १६ ते २० जुलैदरम्यान चलनाद्वारे प्रवेश शुल्क भरावे लागणार असून, २१ जुलै २०२६ पासून वसतिगृह प्रत्यक्ष सुरू होणार आहे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.