सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागे राहून भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करणारे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी बापू पवार यांचे नाव आगामी विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारीसाठी जोरदार चर्चेत आले आहे. गेली तब्बल ३२ वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या पवारांना आता विधानभवनात पाठवण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून तीव्र होताना दिसत आहे.सोलापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार, संघटनात्मक बळकटी आणि निवडणूक व्यवस्थापन यामध्ये शहाजी बापू पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे पक्षातील अनेक कार्यकर्ते सांगतात.

बूथ पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटना उभारणे, नाराज गटांना एकत्र आणणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि निवडणुकीच्या काळात अचूक राजकीय नियोजन करणे, या बाबतीत त्यांची ओळख पक्षातील “रणनीतीकार” अशी निर्माण झाली आहे.२०१३ मध्ये भाजपची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सोलापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक होता. अशा परिस्थितीत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने दौरे केले. अनेक गावांमध्ये भाजपचा विचार पोहोचवणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि स्थानिक नेतृत्व तयार करणे यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे बोलले जाते.

विशेषतः निवडणुकीच्या काळात अनेक मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन, कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करणे आणि संघटनात्मक पातळीवर वातावरणनिर्मिती करण्यामध्ये शहाजी बापू पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अनेक नेत्यांना निवडणुकीत यश मिळवून देताना त्यांनी स्वतः कधीही सत्तापदासाठी आग्रह धरला नाही, ही बाब त्यांच्या समर्थकांकडून वारंवार अधोरेखित केली जाते.राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या आणि संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांचा सन्मान करण्याची वेळ आता आली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये “ज्यांनी इतरांना आमदार केले, त्यांनाही आता आमदारकीची संधी मिळावी” अशी भावना व्यक्त होत आहे.

भाजपमध्ये विविध नावांची चर्चा असली, तरी निष्ठा, अनुभव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमधील स्वीकारार्हता या निकषांवर शहाजी बापू पवार यांचे नाव अधिक प्रभावी मानले जात असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. काही कार्यकर्त्यांच्या मते, पक्षाने जर निष्ठावंत नेतृत्वाला संधी दिली तर त्याचा सकारात्मक संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकतो.

दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रभावाखालील राजकीय वातावरणात भाजपचा विस्तार घडवून आणताना पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही समर्थक सांगतात. जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणांमध्ये पडद्यामागून भूमिका बजावत त्यांनी भाजपला संघटनात्मक बळ दिल्याचे मानले जाते.सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात “सगळे आमदार झाले, आता बापूंची बारी” हा नारा चर्चेत असून, आगामी विधानपरिषदेच्या निवडीत भाजपचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, शहाजी बापू पवार यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत पक्ष त्यांना विधानभवनात पाठवणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.











