सोलापूर ; जनगणना 2027 ही भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगीक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरविण्याची प्रक्रिया आहे. आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्वगणनेस सुरुवात होत आहे. तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी स्व जनगणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी विरोधी योद्धे, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व अन्य मान्यवर विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री . गोरे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राने सन २०२५-२६ मध्ये उल्लेखनिय प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा मोठा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ४ लाख ८६ हजार लाभार्थ्यांना ९७ कोटी ३९ लाख रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक व समप्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100% टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी निधी मंजूर आहे. सदर निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे हाती घेता येतील. सोलापूर वासियांचे विमान सेवा सुरु करण्याचे अनेक दिवसाचे स्वप्न साकार झाले असून सध्या मुंबई, गोवा याठिकाणी विमानसेवा सुरु झाली असून नजीकच्या काळात तिरुपती हैद्राबाद व पुणे या सेवा सुरु होतील. सदर विमान सेवेमुळे सोलापूर मधील उद्योग व्यवसायास चालना मिळाली आहे. भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडींगची सुविधा सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर येथील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नविन IT पार्कची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठीच्या जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. नविन IT पार्कमुळे सोलापूर मधील उच्च शिक्षित युवकांना स्थानिक रोजगार मिळणार आहे. नविन पाणी पुरवठा योजनेमुळे सोलापूर शहरवासियांना नियमित, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी 1378 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले











