शेतकरी व गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मौजे माचणूर येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची जीर्ण व खराब झालेली दारे बदलून देण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित बंधाऱ्याची खराब झालेली दारे (बर्गे) बदलण्यात आली असून स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नाला दिलासा मिळाला आहे.माचणूर येथील बंधाऱ्याची दारे कालांतराने जीर्ण झाल्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने (४.५ मीटर) अडविता येत नव्हते.

परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून शेतजमिनींचे नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. या बंधाऱ्यावर माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण, अर्धनारी, मुंढेवाडी, वडदेगाव आदी गावांचा पाणीपुरवठा व शेती अवलंबून आहे.स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन देत तात्काळ दखल घेण्याची मागणी केली होती.याची गंभीर दखल घेत खासदार शिंदे यांनी मा. अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर यांना पत्र देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली होती.
त्यांच्या पाठपुराव्यानंतर बंधाऱ्याची खराब झालेली दारे बदलण्यात आली आहेत.तसेच अलीकडील पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी भरावा वाहून गेला असल्याने तो पुन्हा टाकण्याबाबतही कार्यकारी अभियंता कथले साहेब यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.खासदार प्रणिती शिंदे यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली असून स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











