सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना सोलापूर दौऱ्यावर पाठवले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) एकही मत वाया जाऊ नये, यासाठी चिवटे यांनी जिल्ह्यात ठाण मांडत निवडणूक नियोजनाला वेग दिला आहे. मंगेश चिवटे यांनी उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्यासमवेत जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व मतदारांच्या तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधून महायुतीच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.




निवडणूक नियोजनासाठी मंगेश चिवटे यांनी आमदार अभिजित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद गटनेते चरणराज चवरे, अनिल सावंत (शिवसेना), भगीरथ भालके, नगरसेवक अमोल शिंदे, रमेश बारसकर, मनसेचे दिलीप बापू धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती, मतदारांचे गणित आणि विजयाची रणनीती यावर विचारविनिमय करण्यात आला.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेशही संबंधित नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. “राजाभाऊ राऊत हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, मंगेश चिवटे हे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून थेट संवादही घडवून आणत आहेत. मतदार आणि कार्यकर्त्यांशी वरिष्ठ नेत्यांचा थेट संपर्क साधला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महायुतीची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.












