पंढरीत प्रथमच जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा; आषाढी वारीच्या नियोजनाला मिळाली नवी दिशा

पंढरपूर : संतश्रेष्ठ विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरी पंढरपूर येथे प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे झालेल्या या बैठकीत आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, विविध विकासकामे आणि विभागीय समन्वयाचा सखोल आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व शाळा समितीचे सभापती रामपा चिवडाशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आषाढी वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना, लाखो वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. वारी व्यवस्थापनात स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.सभेदरम्यान समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी मांडलेली ‘प्री वारी’ आणि ‘पोस्ट वारी’ ही संकल्पना विशेष चर्चेचा विषय ठरली. वारीपूर्व काळात स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि रस्ते दुरुस्तीचे प्रभावी नियोजन तसेच वारीनंतर तातडीने स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे पुनर्संचयितीकरण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली.बैठकीत ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती सादर करत आगामी नियोजन मांडले.पंढरपूरमध्ये प्रथमच झालेल्या या ऐतिहासिक स्थायी समिती सभेमुळे आषाढी वारीच्या नियोजनाला अधिक बळ मिळाले असून, स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आदर्श वारी घडवून आणण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











