सोलापूर,: हत्तूर बायपास ब्रिजजवळ भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात २ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडला असून अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. या अपघातात रहेमान ढवळीगी (शेख) आणि त्यांचे मित्र राजू शेख यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. दोघेही घरी परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मयत रहेमान यांचे भाऊ इस्माईल मौला ढवळीगी (रा. सलगरवाडी, डोणगाव रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, महिंद्रा पिकअप (क्र. एमएच १३ ईपी २३४०) च्या अज्ञात चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातासाठी जबाबदार चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे











