२२ पानी चिठ्ठीत आर्थिक नुकसानीची व्यथा; वैरागजवळील हत्तीज येथील हृदयद्रावक घटना
सोलापूर : शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील वैरागजवळील हत्तीज येथे उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळला असून, आर्थिक तणावाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१) हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक तपासानुसार, शेअर बाजारातील गुंतवणुकीत सातत्याने तोटा झाल्याने त्यांच्यावर सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. नातेवाईक आणि परिचितांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याचा वाढता ताण आणि आर्थिक विवंचना यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश पाटील यांनी प्रथम पत्नी माधुरी पाटील, मोठा मुलगा अथर्व आणि धाकटा मुलगा शिवांश यांना विष दिले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने हत्तीज गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांना योगेश पाटील यांनी लिहिलेली २२ पानांची सविस्तर चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत शेअर बाजारातील व्यवहार, झालेला आर्थिक तोटा, वाढते कर्ज, उसनवारीचे पैसे फेडता न आल्याची खंत आणि मानसिक तणाव यांचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिठ्ठीतील मजकुराचा सखोल तपास सुरू असून, वैराग पोलीस पुढील तपास करीत आहेत.
उन्हाळी सुट्टीनिमित्त योगेश पाटील हे कुटुंबासह मूळ गावी आले होते. त्यांचे वडील दिवंगत झाले असून आई हयात आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आईची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास, त्यातून झालेले नुकसान आणि त्यानंतरची आर्थिक घुसमट याबाबत त्यांनी सविस्तर माहिती नमूद केली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
- २२ पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती
- घटनेपूर्वी योगेश पाटील यांनी २२ पानांची सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात शेअर बाजारातील व्यवहार, आर्थिक नुकसान, वाढते कर्ज आणि कर्जफेडीची असमर्थता याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. चिठ्ठीचा तपास सुरू असून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.










