सोलापूर : सोलापूरच्या दुष्काळी मातीवर मात करुण उभारलेले नेतृत्व़, ज्याने गेल्या तीन दशकांपासून राजकारण, सहकार, समाजकारण, शेती आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला, ते म्हणजे दिलीप ब्रह्मदेव माने. त्यांच्या नेतृत्वाने सोलापूरच्या मातीत समृद्धीची बिजं रोवली गेली, आणि बळीराजाच्या हृदयात त्यांनी कायमस्वरूपी स्थान मिळवलं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच आणि नशिबाच्या खेळाने त्यांना आमदारकीपासून दूर ठेवलं, पण सत्तेच्या खुर्चीशिवायही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लोकनेत्याने आपल्या अथक कार्याने शेतकऱ्यांचा श्वास बनून राहण्याची किमया साधली. कृषी, सहकार, बँकिंग, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने सोलापूरला नवं रूप दिलं. आज, त्यांच्या वाढदिवसाच्या पावन निमित्ताने,या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायी प्रवासाचा आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या त्यांच्या अतूट निष्ठेचा आढावा..राज्यात कांदा विक्रीत अग्रेसर असलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून दिलीपराव माने यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णयांचा धडाका लावला. सोलापूरात बेदाणा मार्केट सुरू करून त्यांनी स्थानिक बेदाणा उत्पादकांना सांगली-तासगावचा प्रवास वाचवला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यांची मोठी बचत झाली.
दरदेखील चांगला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात डाळींबाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. या डाळींब उत्पादकांना परदेशी बाजारपेठेत स्थान मिळावं आणि त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी माने यांनी बाजार समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. डाळिंबाची कॅरेटवर होणारी विक्री वजनावर करण्याचा त्यांचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा तर झालाच, शिवाय त्यांच्या श्रमाला आणि पिकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी माने यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या. शेतीमालाचा एकत्रित लिलाव, विक्री झालेल्या मालाची बिले त्याच दिवशी शेतकऱ्यांना देणे, अचूक वजनासाठी इलेक्ट्रॉनिक काटे, आणि व्यापारी-शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी बाजार समितीच्या आवारात बँक शाखांची उपलब्धता यासारख्या सुधारणांनी शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य झालं. आणि विश्वास आणखी दृढ झाला.
शेतकऱ्यांच्या हिताचा अटल ध्यास चौथ्यांदा बाजार समितीचं सभापतीपद स्वीकारल्यानंतर दिलीपराव माने यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत निर्णयांचा धडाका लावला. शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षा व्हावी यासाठी त्यांनी व्यापारी, हमाल, तोलार, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गासोबत तातडीच्या बैठका घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक,निवारा शेड आणि सुरक्षा रक्षकांसाठी वॉकी-टॉकी सुविधा,कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करुन त्यांनी बाजार समिती शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह जपली आहे.शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी त्यांनी कठोर नियम लागू केले. प्रसंगी स्वतः पहाटेच अचानक बाजार समितीत फेरफटका मारत व्यवहारांवर लक्ष ठेवले आहे. प्रशासनाला हायटेक करत असतानाच माने यांनी दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी भाजीपाल्याच्या दिवसातातून दोनदा लिलाव पध्द़त सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अधिक संधी उपलब्ध झाल्या. याशिवाय, बेदाणे व्यापाऱ्यांकडून ‘कडता’च्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी माने यांनी कठोर पावलं उचलली. बेदाणा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून दिड/दोन किलो बेदाणा कडता म्हणून घेतला जात होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 800 ते 1000 रुपयांचं नुकसान होत होतं. ही लूट थांबवण्यासाठी यापुढे केवळ ५०० ग्राम कडता घेण्याचा महत्त्वपूर्ण नियम लागू करण्याचे काम माने यांनी केलं, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला आणि त्यांचा बाजार समितीवरील विश्वास वाढला. एवढेच नाही तर दिलीपराव माने यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या बाजार समितीचे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण करून सोलापूरच्या ग्रामदैवताला आदरांजली वाहिली.यामुळे शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यांच्या या कृतीतून त्यांच्या कार्यतत्परतेची आणि बळीराजाच्या श्रमा प्रती असलेल्या निष्ठेची प्रचिती दिसून येते.
शेतकऱ्यांचा लढवय्या नेता..शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या मुशीत तयार झालेल्या दिलीपराव माने यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आपल्या कार्याची सुरुवात केली. वीज महामंडळाच्या अवाजवी बिलांविरोधात त्यांनी आंदोलन उभारलं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सीना खोऱ्यातील शेतकऱ्यांची पिकं पाण्याअभावी जळत असताना जलसंपदा विभागाच्या आडमुठ्या धोरणांविरोधात त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसत सौंदणे कट येथे जाऊन शेतकऱ्यांसाठी पाण्याची वाट मोकळी केली. दुष्काळाच्या काळात सीना कोळेगाव धरणातून जनावरांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषण केलं आणि प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पाडलं. प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याची धमक दाखवणाऱ्या या नेत्याने बळीराजाला नेहमीच आपला श्वास मानलं. त्यांच्या या आंदोलनांनी शेतकऱ्यांना केवळ न्याय मिळाला नाही, तर त्यांचा प्रशासनावरील विश्वासही वाढला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिद्धनाथस्व. ब्रह्मदेवदादा माने यांनी सहकार, शिक्षण, समाजकारण आणि राजकारणात दिलेल्या योगदानाचा वारसा दिलीपराव माने यांनी यशस्वीपणे पुढे नेला आहे. सीना नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी या हेतूने सहकार तपस्वी ब्रह्मदेवदांच्या प्रेरणेने त्यांनी तिऱ्हे येथे सिद्धनाथ साखर कारखाना उभारण्याचे धाडसी पाऊल उचलले.अवघ्या नऊ महिन्यांत कारखाना उभारून गाळप हंगाम सुरू करण्यात आला.आज या कारखान्याचा १५वा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपासाठी स्वीकारला जातो व त्यांना योग्य दरही दिला जातो. या साखर कारखान्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधीही वाढल्या असून गावखेड्यातील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे.
सहकार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी : सहकार क्षेत्रात दिलीपरावराव माने यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. ब्रह्मदेवदांनी स्थापन केलेल्या यशवंत बँकेचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी बँकेला सुवर्ण महोत्सवी वर्षात नेले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत २३ शाखांतून ग्राहकांना दर्जेदार सेवा देत बँकेचा लौकिक राज्यभर निर्माण केला. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा लेबर फेडरेशन, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ यांसारख्या संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून अडचणीच्या काळातही संस्था यशस्वीरित्या चालवल्या. त्यामुळे हजारो शेतकरी, दूध उत्पादक, सहकारी संस्थांचे हित जपले गेले.जिल्हा सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना ऊस लागवड,दुग्धव्यवसाय आणि इतर शेती व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करून त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं. ब्रम्हदेव दादा माने बँकेच्या माध्यमातून युवकांना उद्योग्य व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून पत पुरवठा करत नव उद्योजकांच्या पंखांना अधिकचे बळ दिले. त्यांचे सहकार, बँकिंग, कृषी, पणन या क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे.
उच्च शिक्षणाची गंगा..गावखेड्यात शिक्षण क्षेत्रातही आदरणीय दिलीपराव माने यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी कुमठे येथे बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक शिक्षण संस्था आणि पाॅलिटेक्निक कॉलेज उभारले. तसेच,सोलापूर–मंगळवेढा रोडवरील बेलाटी येथे इंग्रजी माध्यम शाळा,उच्च माध्यमिक विद्यालय, अभियांत्रिकी, आणि एमबीए कॉलेज असे शैक्षणिक संकूल उभे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आणि उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी दारे खुली केली.आज सीना काठच्या शेतकऱ्यांची मुले माने यांच्या शिक्षण संस्थेतून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांत लाखो रुपयांच्या पॅकेजवर काम करताना दिसून येतात. याशिवाय महिलांना स्वयंसिद्धा बनवण्यासाठी, युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक ग्रामीण खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली.या सर्व यशाचं श्रेय दिलीपराव माने यांच्या दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेला जातं.दिलीपराव माने हे २००९ ते २०१४ या काळात आमदार असताना त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणून विविध विकासकामांची गती वाढवली. बळीराजाच्या पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत गरजांबाबत त्यांनी नेहमी शासन दरबारी ठाम भूमिका घेतली आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी त्यांनी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करून हजारो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले.