सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती व मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली. पूरामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारतींसह विविध मूलभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बाधित शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घेणे, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्याच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली. हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शाळांच्या हस्तांतरणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
पूरग्रस्त तसेच हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य लक्षात घेऊन शाळांच्या विकासासाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.पूरग्रस्त शाळांची दुरुस्ती आणि हद्दवाढ भागातील शाळांचे हस्तांतरण या दोन्ही विषयांमुळे सोलापूरच्या शैक्षणिक सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.